‘आज बोलणार आहे मी. किती दिवस हा आवाज दडपणार आहेस? जाणीव होऊनसुद्धा असं वागणं म्हणजे बेदखलपणा झाला हा.’
‘समजून घेत आहेस तू? अरे त्या कर्णानं इथे याच विलक्षण तन्मयतेने उपासना केली, मीरेने स्वतःला अर्पण केलं, तर शिवाजीने अशक्यात शक्य शोधलं. मी तिथेच पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, इंच इंच अंतर रोज काढत.’
‘खिजवायचं म्हणून नाही म्हणत, पण कुठे पोचला आहेस तू आजवर? इंच इंचाची गोष्ट करताना पुढे जातोयेस का मागे याचं तरी भान आहे ? आणि पोहोचायचय ते तरी कुठे? जाणून आहेस ना, अगणित अमर्याद ते गाठता यायचं नाही. कधीच. शक्यच नाही.’
‘शक्य आहे. कित्येक तरी संगीत उपासकांनी संगीतविद्येत शोधलंय त्याला. रामानुजन ने तर गणितात शोधलंय. विवेकानंदांनी ज्ञानात शोधलंय.’
‘कुठे शोधलय? कशावरून? आणि कुठपर्यंत? व्याख्या करता येतेय तुला, जिथे ‘पोहोचायचय’ त्याची?’
‘व्याख्या? करायलाच हवी का ती? ब्रह्मानंदी टाळी लागणे याचा अर्थ उमजतो? मला तिथे पोहोचायचय जिथे मी स्वतःला विद्येच्या उपासनेत, माझ्या स्वकर्मात, स्वतःला विसरून गुंग होऊ इच्छितो. आता ते नेमकं काय हे तिथवर पोहोचल्या शिवाय सांगणं अशक्य.’
‘प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात.’
‘मात्र मी मर्यादेपलीकडच्या प्रवासालाच लागू इच्छितो.’
‘कसं करणार आहेस ते मात्र? कसं समजेल आणि?’
‘खरंच फार कल्पना नाहीये, अजूनही. पण जे जे काही अगणित अमर्याद आहे ना, ते सगळं माझ्या विद्येची जोडत जाणार आहे मी. त्याचसोबत विद्येला ब्रम्हांडात एकरूप करत उपासना करत राहणार. बाकी समजायचा भाग. जर ह्या विद्येची व्याप्ती इतकी प्रचंड तर ती उमजायची, मोजायची गरज भासत नाही मला. तो एक फक्त अनुभव असेल अनुभव, अगणित आनंदाचा. आता तर माझा फक्त प्रवासच सुरू झालाय.’
‘नक्की शुद्धीवर आहेस ना, भान वगैरे हरपलं तर नाही ना?’
‘भान हरपायलाच हवंय. जाऊ दे मला. मी जाणार आहे. ह्याच वाटेवर.’
‘बरं. जा तर मग. उपासना कर. कधीच मागे वळून पाहू नकोस. आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. ज्या क्षणी तुझा विश्वास बसेल की तुला माझ्या आवाजाची गरज नाही त्यावेळी तुला असणाऱ्या माझ्या आवाजाची गरज संपलेली असेल. किंबहुना तो क्षण आता आलाच आहे.’
‘हो.’
‘पण लक्षात ठेव. ध्येय अगणित अमर्याद म्हणून ध्यास सोडून न देता मर्यादेकडून अमर्यादा कडे जा. थेंबे थेंबे तळे साचे जाईल. विद्याप्राप्ति तीच ज्ञानप्राप्ती तीच ईश्वरप्राप्ती. आणि तीच स्वप्राप्ती. तिथे माझं अस्तित्व राहणार नाही; किंबहुना तुझंसुद्धा.’
Notes : Influenced by the trailer of an upcoming film ‘The disciple’, by Chaitanya Tamhane. This is a conversation between two contrasting sides of our mind, one which wants us to go forward and one which holds back because of potential risks. After watching the trailer, I kept wondering about the subject; how long and to what extent would we keep striving for excellence. Even after thinking of knowledge/ vidya as the ultimate goal, is there any end? If so, is it really the end?